अध्याय २: ओव्या ३३१- ३४७

२२ जुलै २०१७ निरुपण
अध्याय २: सांख्ययोग (गीता श्लोक ६४- ६६/ ज्ञानेश्वरी ओव्या ३३१- ३४७ )



रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् । आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ ६४॥
म्हणौनि विषय हे आघवे । सर्वथा मनौनि सांडावे । मग रागद्वेष स्वभावें । नाशतील ॥ ३३१ ॥
पार्था आणिकही एक । जरी नाशले रागद्वेष । तरी इंद्रियां विषयीं बाधक । रमतां नाहीं ॥ ३३२ ॥
जैसा सूर्य आकाशगतु । रश्मिकरें जगातें स्पर्शतु । तरी संगदोषें काय लिंपतु । तेथिचेनि ॥ ३३३ ॥
तैसा इंद्रियार्थीं उदासीन । आत्मरसेंचि निर्भिन्न । जो कामक्रोधविहीन । होऊनि असे ॥ ३३४ ॥
तरी विषयां तयां कांहीं । आपणपेंवांचूनि नाहीं । मग विषय कवण कायी । बाधितील कवणा ॥ ३३५ ॥
जरी उदकीं उदक बुडिजे । कां अग्नि आगी पोळिजे । तरी विषयसंगे आप्‍लविजे । परिपूर्णु तो ॥ ३३६ ॥
ऐसा आपणचि केवळु । होऊनि असे निखळु । तयाचि प्रज्ञा अचळु । निभ्रांत मानीं ॥ ३३७ ॥

प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते । प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥ ६५॥
देखैं अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता । तेथ रिगणें नाहीं समस्तां । संसारदुःखां ॥ ३३८ ॥
जैसा अमृताचा निर्झरु । प्रसवे जयाचा जठरु । तया क्षुधेतृषेचा अडदरु । कहींचि नाहीं ॥ ३३९ ॥
तैसें हृदय प्रसन्न होये । तरी दुःख कैचें कें आहे ? । तेथ आपैसी बुद्धि राहे । परमात्मरूपीं ॥ ३४० ॥
जैसा निर्वातीचा दीपु । सर्वथा नेणें कंपु । तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु । योगयुक्तु ॥ ३४१ ॥
नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना । न चाभावयतः शांतिरशान्तस्य कुतः सुखम् ॥ ६६॥
ये युक्तीची कडसणी । नाहीं जयाच्या अंतःकरणीं । तो आकळिला जाण गुणीं । विषयादिकीं ॥ ३४२ ॥
तया स्थिरबुद्धि पार्था । कहीं नाहीं सर्वथा । आणि स्थैर्याची आस्था । तेही नुपजे ॥ ३४३ ॥
निश्चळत्वाची भावना । जरी नव्हेचि देखैं मना । तरी शांति केवीं अर्जुना । आपु होय ॥ ३४४ ॥
जेथ शांतीचा जिव्हाळा नाहीं । तेथ सुख विसरोनि न रिगे कहीं । जैसा पापियाच्या ठायीं । मोक्षु न वसे ॥ ३४५ ॥
देखैं अग्निमाजीं घापती । तियें बीजें जरी विरूढती । तरी अशांता सुखप्राप्ती । घडों शके ॥ ३४६ ॥
म्हणौनि अयुक्तपण मनाचें । तेंचि सर्वस्व दुःखाचें । या कारणें इंद्रियांचें । दमन निकें ॥ ३४७ ॥

मागच्या श्लोकात आपण बघितले कि क्रोधातून संमोह (मूढभाव) निर्माण होतो, संमोहाने स्मृती भ्रष्ट होते, स्मृती भ्रष्ट झाल्यावर बुद्धीचा (विवेकाचा) नाश होतो आणि विवेकाचा नाश झाल्यावर मनुष्याचे पतन होते.

ह्या पुढच्या श्लोकांमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे भगवान पुढे चालू ठेवत आहेत. भगवान सांगताहेत कि विषय टाकायचे नाहीत तर ते मनातून गळून पडले पाहिजेत - त्याच्यात सहजता असावी ओढून-ताणून विषय मनातून जात नाही. असे झाल्यावर रागद्वेष (आवड-निवड) आपोआपच नष्ट होतील आणि मग इंद्रिये जरी विषयात रममाण झाली तरी ते विषय बाधक होत नाहीत; जसं कि सूर्य आपल्या किरणरूपी हाताने पृथ्वीला स्पर्श करतो तेव्हा सूर्याला काही त्याचा संगदोष लागत नाही. पाणी पाण्यात बुडेल का? अग्नी अग्नीने पोळेल का? त्याचप्रमाणे कर्मयोगी विषयाच्या संगतीने लिप्त होत नाही.

समर्थ रामदास अशा मनुष्याचे वर्णन करताना म्हणतात:

*सदा स्वरूपानुसंधान। हेचि मुख्य साधूचे लक्षण। जनीं असोन आपण। जनावेगळा।।*

आदी शंकराचार्य म्हणतात:

*योगरतोवा भोगरतोवा, संगरतोवा संगविहीनः ।।*
*यस्य ब्रम्हणि रमते चित्तं, नन्दति नन्दति नन्दत्येव ।।*
(योगामध्ये असेल किंवा भोगामध्ये असेल तरीही त्याच्या मनाची अवस्था बदलत नाही कारण त्याचे चित्त ब्रह्मानंदामध्ये रमलेले असते.)

अशी ज्या मनुष्याची बुद्धी/प्रज्ञा स्थिर आहे त्याला कुठलेही विषय बाधत नाहीत. अशा मनुष्याचे मन/चित्त निरंतर प्रसन्न असते आणि जिथे प्रसन्नता असते तिथे संसारदुःखाचा प्रवेशच होत नाही. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात:

*मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धींचे कारण ।*

याविषयी माउली दृष्टांत देतात कि अमृताचा झरा ज्याच्या पोटातच आहे त्याला तहान-भुकेची भीती कशी असेल. ज्याप्रमाणे निवारा असलेली दिव्याची ज्योत मुळीच हलत नाही त्याप्रमाणे योगयुक्त पुरुष स्वस्वरुपी स्थिर असतो.

पण अशी योगयुक्त राहण्याची युक्ती ज्याला गवसली नाही त्याला विषय बांधून ठेवतात; त्याला शांती नाही आणि शांती नसलेल्याला सुख कसे मिळेल. बुद्धी स्थिर व्हावी अशी ज्याला आस्थाच उरत नाही किंवा मन निश्चल व्हावे हि भावनाच ज्याला उपजत नाही त्या मनुष्याला शांती कशी, कोठून मिळणार? विषयात बुडालेल्या माणसाला शांती मिळेल असा विचार करणे म्हणजे भाजलेल्या बी-पासून झाड उगवण्यासारखे आहे - जे कदापिही शक्य नाही.

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099