अध्याय ११ : ओव्या ४२३-४७१

८ डिसेंबर २०१९ निरुपण : गीताजयंती 
अध्याय ११ : विश्वरूपदर्शनयोगः (गीता श्लोक २८-३३ / ज्ञानेश्वरी ओव्या ४२३-४७१)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


यथा नदीनाम् बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति । तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति ॥ २८॥
जैसे महानदीचे वोघ । वहिले ठाकिती समुद्राचें आंग । तैसें आघवाचिकडूनि जग । प्रवेशत मुखीं ॥ ४२३ ॥
आयुष्यपंथें प्राणिगणी । करोनि अहोरात्रांची मोवणी । वेगें वक्त्रामिळणीं । साधिजत आहाती ॥ ४२४ ॥
यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः । तथैव नाशाय विशन्ति लोका स्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः ॥ २९॥
जळतया गिरीच्या गवखा- । माजीं घापती पतंगाचिया झाका । तैसे समग्र लोक देखा । इये वदनीं पडती ॥ ४२५ ॥
परि जेतुलें येथ प्रवेशलें । तें तातलिया लोहें पाणीचि पां गिळिलें । वहवटींहि पुसिलें । नामरूप तयांचें ॥ ४२६ ॥
लेलिह्यसे ग्रसमानः समन्ताल्लोकान्समग्रान्वदनैर्ज्वद्भिः । तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो ॥ ३०॥
आणि येतुलाही आरोगण । करितां भुके नाहीं उणेपण । कैसें दीपन असाधारण । उदयलें यया ॥ ४२७ ॥
जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । का भणगा दुकाळु पाहला । तैसा जिभांचा लळलळाटु देखिला । आवाळुवें चाटितां ॥ ४२८ ॥
तैसें आहाराचे नांवें कांहीं । तोंडापासूनि उरलेंचि नाहीं । कैसी समसमीत नवाई । भुकेलेपणाची ॥ ४२९ ॥
काय सागराचा घोंटु भरावा ? । कीं पर्वताचा घांसु करावा ? ।ब्रह्मकटाहो घालावा । आघवाचि दाढे ॥ ४३० ॥
दिशा सगळियाचि गिळाविया । चांदिणिया चाटूनि घ्याविया । ऐसें वर्तत आहे साविया । लोलुप्य बा तुझें ॥ ४३१ ॥
जैसा भोगीं कामु वाढे । कां इंधनें आगीसि हाकाक चढे । तैसी खातखातांचि तोंडें । खाखांतें ठेलीं ॥ ४३२ ॥
कैसें एकचि केवढें पसरलें । त्रिभुवन जिव्हाग्रीं आहे टेकलें । जैसें कां कवीठ घातलें । वडवानळीं ॥ ४३३ ॥
ऐसीं अपार वदनें । आतां येतुलीं कैंचीं त्रिभुवनें । कां आहारु न मिळतां येणें मानें । वाढविलीं सैंघ ॥ ४३४ ॥
अगा हा लोकु बापुडा । जाहला वदनज्वाळां वरपडा । जैसी वणवेयाचिया वेढां । सांपडती मृगें ॥ ४३५ ॥
आतां तैसें यां विश्वा जाहालें । देव नव्हे हें कर्म आलें । कां जग चळचळां पांगिलें । काळजाळें ॥ ४३६ ॥
आतां इये अंगप्रभेचिये वागुरे । कोणीकडूनि निगिजैल चराचरें । हीं वक्त्रें नोहेती जोहारें । वोडवलीं जगा ॥ ४३७ ॥
आगी आपुलेनि दाहकपणें । कैसेनि पोळिजे तें नेणे । परी जया लागे तया प्राणें । सुटिकाची नाहीं ॥ ४३८ ॥
नातरी माझेनि तिखटपणें । कैसें निवटे हें शस्त्र कायि जाणें । कां आपुलियां मारा नेणें । विष जैसें ॥ ४३९ ॥
तैसी तुज कांहीं । आपुलिया उग्रपणाची सेचि नाहीं । परी ऐलीकडिले मुखीं खाई । हो सरली जगाची ॥ ४४० ॥
अगा आत्मा तूं एकु । सकळ विश्वव्यापकु । तरी कां आम्हां अंतकु । तैसा वोडवलासी ? ॥ ४४१ ॥
तरी मियां सांडिली जीवित्वाची चाड । आणि तुवांही न धरावी भीड । मनीं आहे तें उघड । बोल पां सुखें ॥ ४४२ ॥
किती वाढविसी या उग्ररूपा । आंगींचें भगवंतपण आठवीं बापा । नाहीं तरी कृपा । मजपुरती पाही ॥ ४४३ ॥
आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद । विज्ञातुमिच्छामिभवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् ॥ ३१॥

तरी एक वेळ वेदवेद्या । जी त्रिभुवनैक आद्या । विनवणी विश्ववंद्या । आइकें माझी ॥ ४४४ ॥
ऐसें बोलोनि वीरें । चरण नमस्कारिलें शिरें । मग म्हणें तरी सर्वेश्वरें । अवधारिजो ॥ ४४५ ॥
मियां होआवया समाधान । जी पुसिलें विश्वरूपध्यान । आणि एकेंचि काळें त्रिभुवन । गिळितुचि उठिलासी ॥ ४४६ ॥
तरी तूं कोण कां येतुलीं । इयें भ्यासुरें मुखें कां मेळविलीं । आघवियाचि करीं परिजिलीं । शस्त्रें कांह्या ॥ ४४७ ॥
जी जंव तंव रागीटपणें । वाढोनि गगना आणितोसि उणें । कां डोळे करूनि भिंगुळवाणे । भेडसावीत आहासी ॥ ४४८ ॥
एथ कृतांतेंसि देवा । कासया किजतसे हेवा । हा आपुला तुवां सांगावा । अभिप्राय मज ॥ ४४९ ॥
या बोला म्हणे अनंतु । मी कोण हें आहासी पुसतु । आणि कायिसयालागीं असे वाढतु । उग्रतेसी ॥ ४५० ॥
श्रीभगवानुवाच ।
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः । ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥ ३२॥
तरी मी काळु गा हें फुडें । लोक संहारावयालागीं वाढें । सैंघ पसरिलीं आहातीं तोंडें । आतां ग्रासीन हें आघवें ॥ ४५१ ॥
एथ अर्जुन म्हणे कटकटा । उबगिलों मागिल्या संकटा । म्हणौनि आळविला तंव वोखटा । उवाइला हा ॥ ४५२ ॥
तेवींचि कठिण बोलें आसतुटी । अर्जुन होईल हिंपुटी । म्हणौनि सवेंचि म्हणे किरीटी । परि आन एक असे ॥ ४५३ ॥
तरी आतांचिये संहारवाहरे । तुम्हीं पांडव असा बाहिरे । तेथ जातजातां धनुर्धरें । सांवरिले प्राण ॥ ४५४ ॥
होता मरणमहामारीं गेला । तो मागुता सावधु जाहला ।मग लागला बोला । चित्त देऊं ॥ ४५५ ॥
ऐसें म्हणिजत आहे देवें । अर्जुना तुम्ही माझें हें जाणावें । येर जाण मी आघवें । सरलों ग्रासूं ॥ ४५६ ॥
वज्रानळीं प्रचंडीं । जैसी घापे लोणियाची उंडी । तैसें जग हें माझिया तोंडीं । तुवां देखिलें जें ॥ ४५७ ॥
तरी तयामाझारीं कांहीं । भरंवसेनि उणें नाहीं । इये वायांचि सैन्यें पाहीं । बरवतें आहाती ॥ ४५८ ॥
ऐसा चतुरंगाचिया संपदा । करित महाकाळेंसीं स्पर्धा । वांटिवेचिया मदा । वघळले जे ॥ ४५९ ॥
हे जे मिळोनियां मेळे । कुंथती वीरवृत्तीचेनि बळें । यमावरी गजदळें । वाखाणिजताती ॥ ४६० ॥
म्हणती सृष्टीवरी सृष्टी करूं । आण वाहूनि मृत्यूतें मारूं । आणि जगाचा भरूं । घोंटु यया ॥ ४६१ ॥
पृथ्वी सगळीचि गिळूं । आकाश वरिच्यावरी जाळूं । कां बाणवरी खिळूं । वारयातें ॥ ४६२ ॥
बोल हतियेराहूनि तिखट । दिसती अग्निपरिस दासट । मारकपणें काळकूट । महुर म्हणत ॥ ४६३ ॥
तरी हे गंधर्वनगरींचे उमाळे । जाण पोकळीचे पेंडवळें । अगा चित्रीव फळें । वीर हे देखें ॥ ४६४ ॥
हां गा मृगजळाचा पूर आला । दळ नव्हे कापडाचा साप केला । इया शृंगारूनियां खाला । मांडिलिया पैं ॥ ४६५ ॥
तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून्भुंक्ष्व राज्यं समृद्धम् । मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥ ३३॥
येर चेष्टवितें जें बळ । तें मागांचि मियां ग्रासिलें सकळ । आतां कोल्हारिचे वेताळ । तैसे निर्जीव हे आहाती ॥ ४६६ ॥
हालविती दोरी तुटली । तरी तियें खांबावरील बाहुलीं । भलतेणें लोटिलीं । उलथोनि पडती ॥ ४६७ ॥
तैसा सैन्याचा यया बगा । मोडतां वेळू न लगेल पैं गा । म्हणौनि उठीं उठीं वेगां । शाहाणा होईं ॥ ४६८ ॥
तुवां गोग्रहणाचेनि अवसरें । घातलें मोहनास्त्र एकसरें । मग विराटाचेनि महाभेडें उत्तरें । आसडूनि नागाविलें ॥ ४६९ ॥
आतां हें त्याहूनि निपटारें जहालें । निवटीं आयितें रण पडिलें । घेईं यश रिपु जिंतिले । एकलेनि अर्जुनें ॥ ४७० ॥
आणि कोरडें यशचि नोहे । समग्र राज्यही आलें आहे । तूं निमित्तमात्रचि होयें । सव्यसाची ॥ ४७१ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099