गायत्री गलगलीकर स्वाध्याय

गायत्री   गलगलीकर यांनी  "श्री प्रल्हाद महाराज/ जिजीमाय यांची भक्ती आणि भक्त लक्षणे" यावर 20 दिवस गोष्टीरुप स्वाध्याय सादर केला. 

२७ जुलै २०२०

श्री महाराजांच्या कृपेने आणि विवेक दादांच्यामुळे थोडं फार वाचनाचा आणि लिहिण्याचा हा एक छोटा प्रयत्न. अमित दादांनी सांगितल्या प्रमाणे परमार्थ हा दोन मार्गानी करता येतो . "भक्ती मार्ग " आणि " ज्ञान मार्ग ". भक्ती मार्ग हा "भावनेशी "संबंधित आहे आणि ज्ञान मार्ग हा "बुद्धीशी ". आपण अनेक संत आणि त्यांच्ये भक्त पहिले .त्यांची भक्ती पाहिली .तसेच प.पु जीजीमाय यांची श्री रामा बद्दल ,श्री गोंदवलेकर ,श्री रामानंद व त्यांचे पती श्री प्रल्हाद महाराजांनबद्दल असलेली निष्ठा ,प्रेम ,भक्ती या बद्दल बोलणार आहोत . 

प .पु सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज रामदासी (साखरखेर्डा )नामाचा महिमा गाण्यासाठी आणि अध्यात्मदृष्ट्या अज्ञानी असण्याऱ्या लोकांचा भवसागर पार करण्यासाठी विदर्भ प्रांतात अवतरले . त्यांच्या सारख्या विरक्त ,सत्वशील , परोपकारी , समाधानी आणि भोळी भक्तच होऊ शकते . आणि पू .जीजी मायीनकडे पाहिले कि याची खात्री पटते . सद्गुणांची कास धरून गुरु भक्ती , ममत्व , विरहित साधना ,अखंड नामस्मरण आणि खडतर वैराग्य अश्या गुणांमुळे माय बाईंना अंतर्दृष्टी व वाचासिद्धी प्राप्त झालेली होती . आयुष्यभर रामनाम आणि खेर्डा ,जालना ,गोंदवले येथील उत्सव हे मायबाईंनी कधीही चुकवले नाही .सद्गुरु श्री प्रल्हाद महाराजांच्या देह त्यागानंतरही हे राम कार्य अविरत सुरूच होते 

भक्ती लक्षण -अद्वेष्टा 

- अद्वेष्टा म्हणजे कोणाचाही द्वेष न करणे ,सर्वांवर सारखे प्रेम करणे ,स्वार्थ रहित ,ज्याला सुख दुःख एकसमान असतात , क्षमावान . 

काही व्यक्ती एखाद्या कुळाच भुषण होतात,काही व्यक्ती एखाद्या गावाचे भुषण ठरतात परंतु सर्व जगाचे कल्याण हे श्री सद्गुरुच करु शकतात .हे विश्वची,माझे घर मानणारी,सत्कर्मी रती वाढवणारी,ही आदिशक्ती २० व्या शतकात विदर्भातील सुलतानपूर येथे अवतरली.जे कार्य करण्यासाठी श्री प्रल्हाद महाराज अवतरले होते तेच कार्य करण्यासाठी जिजीमाय ईश्वरी इच्छेनुसार वैराग्यशाली अंतःकरण घेऊन अवतरल्या. 

श्री रामानंद महाराजांनी प्रल्हाद महाराज व जिजामाई यांचे लग्न ठरवले .ही गोष्ट श्री प्रल्हाद महाराजांना समजल्यावर ते अंतःकरणातुन दुखीःत झाले कारण साक्षात मारुतीचेच अंशरुप अवतार असल्यामुळे जन्मतःच विरक्त वृत्ती होती परंतु गुरुआज्ञा असल्यामुळे ते लग्नाला तयार झाले .लग्नाच्या वेळी श्री प्रल्हाद महाराज १३ वर्षाचे होते व जिजीमाईंचे ९ वर्ष. 

कुणी मागता वस्तू भारी कितीही ! 

नसे मोह त्याचा दिले सर्व काही ! 

आपल्या परी मानिले याचकाला ! 

नमस्कार माझा जिजीमाऊलीला ! 

वरील श्लोकामध्ये वर्णन केल्याप्रमाणेच जिजीमाय प्रत्यक्ष किती निस्पृह, निरासक्त,निस्वार्थी, परोपकारी होत्या हे आता आपण सर्वजण पाहणार आहोत. 

जिजीमाईना कुठल्याही प्रकारच्या वस्तुंची संग्रह करण्याची आसक्ती नसे. त्यांना भक्तांनी दिलेल्या सर्व वस्तु त्या प्रसाद म्हणून भक्तांमध्ये वाटून टाकत असत. आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत या माऊलीने अंगावर नेसण्याच्या दोन लुगड्याशिवाय काही ठेवले नाही.महिला भगिनी मायबाईंसाठी भरपूर नविन लुगडी आणत असत.जर कुणी म्हणाले की मायबाई मी आणलेले पातळ नेसा ना तेव्हा जिजीमाय म्हणत तु मला दिलेस ना मग मला ज्याला वाटेल त्याला मी ते देईन. या माऊलीने आयुष्यभर रामनामाच्या संग्रहाशिवाय दुसरा संग्रह केला नाही.एकदा श्री प्रल्हाद महाराज देवघरात जप करत बसले होते.तो दारात एक भिकारीण आली व महाराजांना एखादे वस्ञ मला द्या म्हणू लागली.तीच्या अंगावर फक्त एक साडी होती,त्या साडीलाही ठिगळे लावलेली होती.तिला पाहून महाराजांचे अंतःकरण हेलावले,आणी दोरीवर वाळत घातलेले जिजीमाईंचे चांगले पातळ काढून त्यांनी त्या भिकारीणीला दिले.ती आनंदाने निघून गेली.नंतर महाराजांनी जिजीमाईंना सांगितले.तेव्हा तिचा द्वेश न करता त्याही हा प्रसंग ऐकून आनंदी झाल्या . 

एक प्रसंग असा आहे की श्री प्रल्हाद महाराजांंच्या निर्याणानंतर सिंधुबाई अमरावतीहुन मायबाईंना भेटण्यासाठी आल्या.येताना त्यांनी मायबाईंना पांढरे पातळ आणले.मायबाईंनी हे पहाताच त्यांना म्हणाल्या की "महाराज आपल्यातून गेले असे तुला वाटते का? म्हणून तु मला पांढरे पातळ आणलेस,परंतु महाराज साखरखेर्डा येथे कायमस्वरुपी वास्तव्यास आहेत हे लक्षात ठेव." आणि जिजीमाईंचा या पांढऱ्या पातळामागे बोलण्याचा दुसराही दृष्टिकोन होता तो म्हणजे पांढरे पातळ दुसऱ्या महिलेला देता येत नाही जर रंगीत पातळ असेल तर दुसऱ्या कोणत्याही स्ञीला प्रसाद म्हणून देता येते. धन्य ती माऊली !! करी कृपेची साऊली !!

 

 

२८ जुलै २०२०

 

भक्ति लक्षण—करुणा

जिजीमाऊलीचे जिवन म्हणजे शारदामातेप्रमाणेच होते. शारदा देवीच्या आईवडीलांनी एकदा रामकृष्ण परमहंसांना म्हटले की शारदेला आपण मातृत्व प्रदान करावं तेव्हा रामकृष्ण म्हणाले योग्य वेळ आल्यानंतर इतकी मुले तीला एकदम आई म्हणून हाक मारतील की कुणा च्या हाकेला ओ द्यावी हे तिलाही समजणार नाही आणि झालेही तसेच परमहंसांनंतर शारदादेवीने त्यांच्या हजारो शिष्यांना आईप्रमाणे सांभाळले. त्याप्रमाणेच श्री प्रल्हाद महाराजांंच्या सर्व शिष्यांना जिजी माईंनी सांभाळले. महाराजांनंतर जिजीमाईंनी मातृपद व गुरुपद या दोन्ही भुमिका अगदी निरपेक्षपणे सांभाळल्या.एकदा जिजीमाईंच्या घशामध्ये सुपारीचा तुकडा अडकल्यामुळे घशाला जखम झाली.त्यावर अॉपरेशन हा एकच इलाज स्थानिक डॉक्टरांनी सांगितला. अॉपरेशनही मुंबईला करावे लागणार होते.परंतु प.पू.प्रल्हाद महाराजांनी घरासहीत सर्व दान केल्यामुळे आणि रामाला आलेला पैसा स्वतःच्या वैयक्तिक कारणासाठी वापरायचा नाही असा महाराजांचा नियम असल्यामुळे पैशाची अडचण होती.तेव्हा सर्व शिष्यसंप्रदायाने वर्गणी जमा करुन जिजीमाईंना मुंबईला नेले.मुंबईत तेव्हा तात्यासाहेब केतकर होते.तेथे तात्यासाहेबांनी स्वतः जिजीमाईंना मुंबईत चांगल्या डॉक्टरकडे नेऊन सर्व उपचार करवुन घेतले.अॉपरेशन झाल्यानंतर जिजीमाय साखरखेर्ड्याला परत आल्या,त्यादिवसापासुन जिजीमाय सर्वांना सांगत की माझी मरणाची देखील तयारी होती पण माझ्या पोरांनी म्हणजे शिष्यांनी मला मरु दिले नाही.प.पू.प्रल्हाद महाराज व जिजीमाईंचा गृहस्थाश्रम कसा होता हे थोडक्यात बघुया.श्री प्रल्हाद महाराजांनी रामानंद महाराजांंच्या प्रवचनात एकदा आसक्ती बद्दल ऐकलं होत त्यातुन विरक्तपणा मनात तयार होऊन व रामकार्यामध्ये साधने मध्ये मोह नको म्हणून प्रल्हाद महारा जांनी साखरखेर्डा येथील आपले रहाते घर,त्यातील वस्तु,दागिने,पैसे सर्व गोरगरीबांना दान केले व एका वस्त्रानीशी जिजीमाईंसहीत महाराज बालनाथ मंदिरात रहायला आले होते.त्याचप्रमाणे जमीन जुमला आपल्या सद्गुरुंच्या नावावर केला होता.अशी दानवृत्ती, विरक्ती, करूणासागर,निस्पृहपणा या कलीयुगात हे आश्चर्यच होते.सर्व काही रामाचे व रामच आपले सर्वस्व या भावनेतुनच या दोन्ही उभयतांचा गृहस्थाश्रम शिखरावर पोहोचला.

२९जुलै 2020

भक्तिलक्षण- संगवर्जित: (आसक्ति विरहित)

गुरुमाय प्रल्हाद माझी कृपाळू ! तया लाभली ज्ञानपत्नी दयाळू !

जिजीमाय संबोधीती भक्त तीला ! नमस्कार माझा जिजीमाऊलीला !

साधेपणा,भोळेपणा,स्थायी भाव, सोशिकपणा,सहनशिलता,निस्पृहवृत्तीपरोपकार,पतीआज्ञा, इत्यादी सर्व गुणाचे भांडार म्हणजे प.पू.जिजीमाय गुरुसेवा,अतिथीसेवा,प्रपंच नेटका कसा करावा हे आजकालच्या महिलांनी जिजीमाईंकडून शिकण्या सारखे आहे.या मायबाईंना नटणे, मुरडणे, दागिने,वेशभुषा,इ.आवड नव्हतीच.त्यांना आवड होती फक्त रामनामाची.महाराजांंच्या निर्याणा नंतर एकाने मायबाईला प्रश्न विचारला की मायबाईं तुम्ही सती का बरे गेला नाहीत?यावर मायबाईंनी समर्पक उत्तर दिले की "आयुष्यभर मी महाराजांंच्या अंगाला स्पर्श केला नाही आणि आता सती जाऊन त्यांना का विटाळ करु? आणि अशाने आम्हा दोघांचिही तपश्चर्या फळाला असती का?" यावरून एकच अर्थ निघतो तो म्हणजे महाराज व जिजीमाय फक्त रामनाम प्रचारासाठीच या भुतलावर अवतरले होते.त्यामूले त्या अगदी आसक्ति विरहित होत्या। मागे वर्णन केल्या प्रमाणे जपाच्या व ब्रम्हचर्य प्रभावाने जिजीमाईंना वाचासिद्धी आली होती आणि त्यातुनच ज्या भक्तांचा भाव शुद्ध त्यांच्या अडचणी,समस्या थोड्या फार प्रमाणात दुर होऊ लागल्या. रमेश शुक्ल म्हणून महाराजांंचे अनुग्रहित.त्यांचे घर परभणीला होते परंतु नोकरीत बदली कळमनुरीला झाली होती.त्यांनी परभणीला घराचे बांधकाम सुरु केले परभणीला मुले पत्नी रहात होते.पण शुक्लांना नोकरी करुन बांधकाम पहाणे अवघड जाऊ लागले.त्यासाठी त्यांनी वरीष्ठांना अर्ज केला की माझी बदली परभणी किंवा आसपास करावी.बदलीसाठी भरपूर प्रयत्न केले परंतु यश आले नाही.मग त्यांनी साखरखेर्ड्याला जिजीमाईंना ही समस्या सांगितली तेव्हा जिजीमाई नी त्यांना सांगितले की नित्य नियमाने तुम्ही शनिवार करा,नामात रहा.कार्य सिद्धीस जाईल.एक शनिवार झाल्या नंतरच रमेशराव शुक्लना अनुभव आला.

धन्य ती मायबाईं ! धन्य ते रामनाम !

३० जुलै 2020

भक्तिलक्षण——भक्तिमान (भक्तियुक्त अंत:करणाचा )

साखरखेर्डा येथील काळे घराणे तसे देवभोळे, परोपकारी,दिनदुबळ्यांना आधार वाटणारे,आणि रामावर अतिशय भक्ति.अशा या काळे घराण्यात जिजीमाय संसाराची सारी जबाबदारी सांभाळून सद्गुरुंनी दिलेली साधना करु लागल्या.आदर्श भारतीय नारीचे उत्तम उदाहरण म्हणजे प.पू.जिजीमाय.जिजीमाईंचा रोजचा दिनक्रम असा होता,सकाळी ४ वा उठणे,मानसपूजा,जप करुन,५ वा सडासारवण,रांगोळी,करणे. साखरखेर्डा येथे नेहमीच पाण्याची समस्या असे त्यामुळे धुणे धुवायला भोगावती नदीवर जावे लागे.जिजीमाय देखील जात असत.नंतर स्वयंपाक वगैरे करुन आलेल्या भक्तांना भोजनप्रसाद वाढणे,दुपारी महाराजांचे भोजन झाल्यानंतर जप करुन आपण स्वतः जेवत असत.चार वाजता महाराज दासबोध वाचन करायचे.हे ऐकून लगेच जिजीमाय उपासनेची तयारी करुन उपासना करत असत.रात्रीची शेजारती असे.अशा प्रकारचा दिनक्रम या माऊलीने आयुष्यभर तसाच ठेवला. कालांतराने रामवरचीं त्यांचि निष्ठा आनी भक्ति खूप वाढत गेली जिजीमाईंची साधना एवढी बळकट झाली की महाराजांबरोबरची त्यांची योग्यता झाली.येणाऱ्या प्रत्येक भक्ताला जिजीमाय प्रसाद घेऊन जाण्याचा आग्रह करीत.कुणी काही प्रापंचिक अडचण घेऊन आला म्हणजे त्याला मायबाई सांगत की" सद्गुरु रामानंद महाराज व रामराय आहेत.त्यांनी दिलेले नाम तेवढे आपण निष्ठेने घ्यावे.म्हणजे आपली संकटे रामनामाने दुर होतील" जिजीमाईंच्या या साधनेचा प्रभाव फार जबरदस्त झाला.नामस्मरण आणि भक्ति काय करु शकते याचा एक प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडला.एकदा शेण सारवण करण्याच्या बकेटमध्ये एक साप जाऊन बसला.आणि ती बकेट तशीच जिजीमाईंनी घर सारवायला घेतली.शेणाने माखल्यामुळे साप दिसला नाही.आणि त्या सापानेच पूर्ण घर मायबाईने सारवुन घेतले.घर सारवताना अखंड नाम घेणे सुरूच होते.थोड्या वेळाने महाराजांनी ते बघितले व मायबाईंना विचारले की आज घर कोणत्या पोते-याने सारवले? तो पहातात तो साप होता.सांगण्याचे तात्पर्य म्हणजे नामस्मरणाच्या धुंदीमध्ये जिजीमाऊलीला समजले पण नाही की बकेटमध्ये साप आहे आणि तो सापही कदाचित् त्या नामात त्या भक्तित एवढा गूंग झाला की या माऊलीचा आपल्याला स्पर्श होऊन आपला उद्धार व्हावा या उद्देशाने तो शांत पडून होता.धन्य ती माऊली.धन्य तो जीव ! नामस्मरणाची आणि भक्तिचि ताकद अशी आहे.

३१ जुलै 2020

भक्तिलक्षण — संतुष्ट:

श्रीक्षेत्र साखरखेर्डा येथील माहिती प.पू.प्रल्हाद महाराजांंनी गृहदान केल्यानंतर जिजीमाय वते संतुष्ट होते परीवारा सहीत ते काहीकाळ राममंदिरात राहु लागले ज्या रामाची स्थापना श्री रामानंद महाराजांंच्या हस्ते झाली होती.साखरखेर्डा येथे देसाई देशपांडे नावाचे घराणे आहे,या घरांचे बालनाथ हे मुख्य दैवत.तथा रामानंद महाराजांचे अनुग्रहित. या देशपांडेच्या आग्रहावरुन महाराज बालनाथ मंदिरात वास्तव्यास आले.आपले घरदार गेलयाचे त्याना थोड़े पण दुःख झाले नाहीं .याच बालनाथ मंदिरात सद्गुरु रामानंद महाराजांची मुर्ती,पादुका तथा महाराजांचा प्राण असलेले श्रीरामपंचायतन विराजमान आहे.या स्थापनेच्या सोहळ्याला खुद्द प्रकट ब्रह्मचैतन्य असलेले श्री तात्यासाहेब केतकर जातीने हजर होते. या संस्थानची विश्वस्त व्यवस्था महाराजांंनीच स्वतः तयार करुन संस्थानचा कारभार भक्तांमार्फत सुरु केला परंतु स्वतः कडे कुठलेच पद घेतले नाही.येथील रामपंचायतनाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पंचायतन सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराजांंनी रामानंद महाराजांंना प्रसाद रुपात दिले व रामानंद महाराजांंनी श्री प्रल्हाद महाराजांंना जालना राममंदिरात प्रसाद म्हणून दिले. व त्यासोबतच काही नियमही दिले दररोज पंचायतनाला अभिषेक करुन तिर्थ घेतल्याशिवाय पाणी, अन्न ग्रहण करायचं नाही, एकादशीला पवमानाचा अभिषेक करावा.हे नियम आयुष्यभर प्रल्हाद महाराजांंनी पाळले. जिजीमाय देखील दररोज पंचायतनाचे तिर्थ घेत असत.आजही संस्थानमध्ये हे नियम तंतोतंत पाळले जातात. साखरखेर्डा संस्थानमध्ये आजही अखंड अन्नदान व रामनाम या महाराजांंनी सांगितलेल्या गोष्टी अगदी नियमानुसार पाळल्या जातात.कुणीही भक्त कोणत्याही वेळेला येवो तो प्रसाद घेतल्याशिवाय तेथुन जाऊच शकत नाही. महाराजांंच्या महानिर्याणानंतर जिजीमाईंनी संपूर्ण संस्थानची धुरा सांभाळली.महाराजांंच्या स्वभाव व कार्याला अनुरुप अशी

सहधर्मचारीणी जिजीमाईंच्या रुपाने महाराजांंना मिळाली होती. महाराजांचा जिजीमाईंना आदरयुक्त धाक होता परंतु त्याप्रमाणेच महाराजांवर जिजीमाईंची निष्ठा देखील तेवढीच होती.महाराज जर आजारी पडले तर मायबाईं उपास तापास करीत, रामरायाला साकडे घालीत. महाराजांचा प्रत्येक शब्द जिजीमाईंना बीजमंत्रच वाटे.त्यांनी केलेल्या सुचना या माऊलीने आयुष्यभर पाळल्या. परगावी जाताना महाराज मायबाईंना सोबत नेत पण जर एकटेच जायचं असेल तर ते मायबाईंना सांगत की आज तु येथेच मंदिरात मौनव्रत पाळून जप कर.

धन्य ती साध्वी पतिव्रता ! धन्य तिचे जीवन !! 

१ ऑगस्ट 2020

भक्तिलक्षण—-अनपेक्ष

दिसे शांत मुर्ती उदरात किर्ती ! नसे वासना कामनाही कशी ती!

असे शांत भोळी नसे लोभ केला ! नमस्कार माझा जिजीमाऊलीला!

श्री प्रल्हाद महाराज व जिजीमाय यांचा विवाह म्हणजे निर्गुण निरंकार तत्वाचा मायेशी विवाह होता.लग्न मुहुर्त होता मार्गशिर्ष वद्य त्रयोदशी शके १८३२. लग्नाची सर्व तयारी झाली.व्दादशीला साखरखेर्डा हुन मेहकर साठी सगळे व-हाड निघाले.परंतु त्याचवेळी गोंदवल्याहुन पांडूरंगबुवांना म्हणजे रामानंद महाराजांना सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराजांचे पत्र आले त्यात अशी आज्ञा होती की "बुवा जर जेवत असाल तर हात धुवायला गोंदवल्याला येणे म्हणजे लवकरच पोहोचावे" हे पत्र रामानंद महाराजांनी प्रल्हाद महाराजांना दाखविले आणि माझे या लग्नाला येणे होणार नाही असे सांगितले कारण गुरुआज्ञा प्रथम.रामानंद महाराज त्वरीत गोंदवल्याला पोहोचले तेथे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी रामानंद महाराजाँचे लग्न आनंदसागर महाराजांच्या मूलिशि ठरवले होते.या लग्नाचे विशेष म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्रयोदशीलाच हे लग्न ठरवले होते म्हणजे रामानंद महाराज व प्रल्हाद महाराज यांचा विवाह एकाच दिवशी.गुरु शिष्याचा विवाह एकाच दिवशी आणी दोघांच्याही जिवनात फक्त फक्त गुरुआज्ञा म्हणून विवाह करणे.किती योगायोग आहे हा, फारच सुंदर.एक लग्न गोंदवल्याला साक्षात रामासमोर व एक लग्न मेहकरला बालाजीसमोर.

९ वर्षांची कृष्णाबाई साखरखेर्डा येथील काळे घराण्यात खेळू बागडू लागली,असे ६ वर्ष निघून गेल्यानंतर व योग्य वय झाल्यावर या दोघांच्याही घरच्या मंडळीनी गर्भाधानाचा मुहुर्त ठरविला.पती-पत्नीच्या एकांताची वेळ मोठ्या कसोशीने आली.दोघेही विरक्त. तेव्हा श्री प्रल्हाद महाराज कृष्णाबाईंना अर्थात जिजीमाईंना म्हणाले " हा संसार शाश्वत नाही.या जगात शाश्वत फक्त रामरायाचे नाम.आपल्याला या मनुष्य लोकामध्ये जिवनाचे सार्थक करुन घ्यायचे असेल रामाच्या नामासारखे दुसरे साधन नाही. सद्गुरुंच्या व रामरायाच्या कार्यासाठीच आपला जन्म झाला आहे.तेव्हा आपल्या दोघांनाही हा नरदेह सार्थ करायचा असेल तर शाश्वत असे रामनाम घे.ही माळ घेऊ व आणि सतत रामरायाच्या चिंतनात आपले नविन आयुष्य सुरु करु" महाराजांचे हे बोलणे ऐकून ती मायबाई देखील पतीआज्ञा प्रमाण मानुन याला लगेचच तयार झाली.केवढा हा त्याग ! केवढी ही विरक्ती! हे सर्वसामान्य स्त्री करणे शक्यच नाही. श्री प्रल्हाद महाराज म्हणजे रामकृष्ण परमहंस आणि जिजीमाय म्हणजे शारदाबाई. असा या दोघांचा संसार सुरु झाला

२  ऑगस्ट २०२० 

भक्तिलक्षण—-स्थिरमति:

" जणू साऊली माऊली श्री गुरुची ! करी साधना नित्य सेवा व्रताची ! 
वसा हा जिजीमाय दे बालकाला ! नमस्कार माझा जिजीमाऊलीला !

श्री प्रल्हाद महाराजांचे वरील बोलणे कृष्णाबाई देखील पटले.त्याहि सर्व विषयवासना सोडून त्याग करायला झाल्या.त्या अत्यंत स्थिर बुद्धिचया होत्या.महाराजां सारख्या विरक्त,त्यागी, परोपकारी,सत्पुरुषासाठीजिजीमाय अवतरल्या होत्या.हे सिद्ध होण्यास वेळ लागला नाही.आपल्या पतीसारखाच कुठलाही लोभ,हाव या माऊलीने आयुष्यभर केला नाही.उभयता लग्नाला ६ वर्षे झाली होती व एकदिवस महाराजांंच्या आईला वाटू लागले की कृष्णाबाईला आता रामानंद महाराजांचा अनुग्रह द्यावा.आईचा विचार प्रल्हाद महाराजांनी रामानंदाना कळवला.रामानंद महाराज तेव्हा जालना राममंदिरात होते ते तिसऱ्या दिवशी साखरखेर्डा येथे पोहोचले.श्री रामानंद महाराजांचा अनुग्रह घेणे म्हणजे सोपे नव्हते.त्यांचा अनुग्रह म्हणजे कडक नियम, खडतर साधना,नामस्मरण, उपासना आणि या कारणां मुळेच रामानंद महाराजांचा शिष्यसंप्रदाय कमी होता.परंतु जिजीमाईंची योग्यता त्यांना माहिती असल्यामुळेच आणि त्या स्थिर बुद्धिच्या आहेत हे ही त्याना माहित असल्याने ते अनुग्रह देण्यासाठी तयार 
झाले. रामानंद महाराजांनी दोघांनाही वडीलधा-या मंडळींना नमस्कार करायला लावुन जिजीमाईंना विधीपूर्वक अनुग्रह दिला.व जिजीमाईंना नियम सांगितले की आज पासून पती हाच परमेश्वर समजून त्याच्या आज्ञेत रहावे,रोज स्नान झाल्यावर १३ माळी जप करावा व दिवसभरातही इतर फावल्या वेळेतही जास्तीतजास्त जपात रहावे" या प्रमाणे कृष्णाबाईंना सद्गुरुंचा अनुग्रह प्राप्त झाला. जिजीमाईंचा अतिशय भोळा स्वभाव,निस्पृह, निष्कलंक, निष्कपट वृत्ती यामुळे रामानंद महाराज त्यांना प्रेमाने "बावळाबाई" म्हणत.
अनुग्रह झाल्याच्या दिवसापासूनच जिजीमाय घरातील सर्व कामे करुन जास्तीतजास्त नामस्मरण करत असत.

 

३ ऑगस्ट २०२० 

भक्ति लक्षण—-न काड़्क्षति (कोणतीही कामना, इच्छा, अपेक्षा करत नाहीं)

जय जगदंबा खेटकपुरवासिनी! लक्ष्मी शारदा स्वरुपिनी ! 
सावित्री सीता मनमोहीनी ! अनेक रुपे तु नटली ! 

सद्गुरु रामानंद महाराजांंची आज्ञा कशी मोडावी म्हणून श्री प्रल्हाद महाराजांंनी जिजीमाईंशी विवाह केला.परंतु त्यांना या संंसारात रसच नव्हता त्यांना आवड होती ती राम नामाची.सद्गुरु प्रल्हाद महाराजांमुळे जिजीमाईंचे जीवन सार्थकी लागले. महाराजांंनी जिजीमाईं कडून वेळो वेळी साधना, नामजप करवुन घेतला. त्यामुळेच मायबाईंची साधना उत्तरोत्तर वाढू लागली.स.भ.श्री विनायक कुंडीकर व त्यांच्या पत्नी सौ.शारदाबाईंच्या लग्नाला १२ वर्षे झाली होती तरी देखील त्यांना पूत्र प्राप्ती नव्हती.त्यांनी मायबाईंना ही अडचण सांगितली.मायबाईंनी त्यावर उपाय सांगितला की तुळशी मध्ये बाळकृष्ण ठेवून दररोज १०८ प्रदक्षिणा कराव्या,रोज दोघांनी मिळुन १३००० जप करावा.या उभयतांनी हे व्रत सुरु केले व ४ ते ५ महिन्यातच त्यांना याची प्रचिती आली आणि ९ मास पूर्ण झाल्यानंतर या दोघांना कल्याण नामक पूत्र झाला. माय बाईंनी आयुष्यभर कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता रामनाम प्रचाराचे कार्य केले.व त्यासाठीच मध्ये मध्ये असे अनुभव लोकांना येऊन जास्तीतजास्त लोक नामाला लावले.प्रत्येक भक्त संस्थान मधुन घरी जाताना मायबाईं त्यांची व्यवस्थित पाठवणी करीत.लेकी सुनांना मायबाईं व महाराज म्हणजे आई वडीलच व साखरखेर्डा म्हणजे माहेर वाटे एवढे प्रेम या दोघांनी आपल्या भक्तांवर केले.मायबाईं नेहमीच भक्तांना सांगत सतत नामस्मरणात रहा महाराज व रामराय तुमचे कल्याण करील. जिजीमाईंनी सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज,सद्गुरु रामानंद महाराज यांच्यावर अत्यंत सुंदर, भावपूर्ण पदे तयार केली होती पण त्याची कुठेही वाच्यता केली नाही.वास्तविक पहाता मायबाईंना लिहीता वाचता काहीच येत नव्हते तरी देखील पदे तयार करणे,ती सुरेल आवाजात म्हणणे हे आपल्या दृष्टीने आश्चर्यच आहे. ही केवळ गुरुकृपा, नामस्मरणाची शक्ती. 
धन्य ती मायबाईं ! सद्भक्तांना आधार देई !

 

४  ऑगस्ट २०२० 

भक्तिलक्षण —करुणा 

श्री जिजीमाय म्हणजे जणू पार्वतीचेच रुप.आदिशक्तीचा हा अवतार जिजीमाईंच्या रुपाने पृथ्वीवर अवतरीत झाला.पतिव्रतापण व नामजपाच्या बळावर जिजीमाईंच्या हातुन आपोआप चमत्कार घडू लागले आणि हे चमत्कार म्हणजे जास्तीत जास्त भक्त रामनामाला लागावित, त्यांना नामाबद्दल दृढनिष्ठा व्हावी यासाठी केलेल्या लीलाच होय. १९७३ मध्ये सर्व शिष्यसंप्रदायाने प.पू.प्रल्हाद महाराजांंची रौप्यतुला करण्याचे ठरवले,अकोला येथील नेहरु पार्क मैदानावर हा रौप्यतुलेचा कार्यक्रम झाला.लाखो भक्त अकोला नगरीत जमले होते.बीबीसी लंडन वरुन या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन होत होते. त्या वेळेचा हा प्रसंग आहे.४ वेदांचे वेदाचार्य,२७१ विद्वान ब्राम्हण यांच्या मधोमध श्री प्रल्हाद महाराजांंच्या मिरवणूकीसाठी सजवलेला रथ होता.रथापुढे भालदार चोपदार आणी रथाच्या मागच्या भागात सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज, त्यांच्यानंतर श्री रामानंद महाराज यांच्या मोठ्या तसबिरी लावलेल्या होत्या. आणि त्यांच्या पायाजवळ श्री प्रल्हाद महाराज बसलेले होते.आजही साखरखेर्डा येथे अशाच पद्धतीने रथ निघतो. सद्गुरुनिष्ठा असावी ती अशी. अशा या भव्य दिव्य रथाला ओढण्या साठी १३ बैलजोड्या जुंपल्या होत्या. जिजीमाईंना या रथामध्ये बसण्या संदर्भात आयोजकांची सुचना नसल्यामुळे त्या आपल्या रुममध्येच होत्या.सर्व शिष्यांनी रामाचा जयघोष केला परंतु या १३ बैलजोड्यांना देखील हा रथ जागचा हालेना.तेव्हा म.म.श्री यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे यांना हा प्रकार लक्षात आला की जिजीमाय रथात बसल्या नाहीत कदाचित त्यामुळेच रथ हालत नसेल.त्यांनी महाराजांची आज्ञा घेऊन जिजीमाईंना तेथे आणले व रथात बसवले.तेव्हा आश्चर्य घडले कि आतापर्यंत जागचा न हालणारा रथ जिजीमाय बसल्या बरोबर क्षणार्धात चालु लागला.या ठिकाणी सर्वांना जिजीमाईंचा अधिकार कळून आला.आदिशक्तीची प्रचिती सर्वांनी बघितली. जिंतुरला जिजीमाईंचे नेहमीच येणे होत असे.येथे आल्या नंतर त्या रंगनाथराव हट्टेकर यांच्या वाड्यात उतरत असत.या वाड्यात विठ्ठल मंदिर देखील होते.यावेळी जिजीमाईंचा तीन दिवस मुक्काम हट्टेकरांकडे होता.या दरम्यान हजारो भक्त विठ्ठलाच्या व जिजीमाईंच्या दर्शनासाठी येत.हट्टेकर बाई स्वतः येणाऱ्या गुरुबंधुंची आस्थेने चौकशी करत.तसेच मायबाईंची देखील सेवा करत. या दगदगीने हट्टेकर बाईंना तिसऱ्या दिवशी कडाडून ताप आला.जिजीमाईंच्या हे लक्षात येऊन त्या म्हणाल्या माझ्या मुळेच हा तुला त्रास होतोय. परंतु हट्टेकर बाईंनी त्यांना सांगितले तसे नाही म्हणून.त्यादिवशी औषध पाणी घेऊनही त्यांचा ताप गेला नाही.तेव्हा जिजीमाईंनी त्या हट्टेकर बाईंचा ताप आपल्या अंगावर ओढवुन घेतला. व आता जिजीमाईंच्या अंगात ताप आला. जे दुसऱ्यांचे दुःख ओळखतात तेच खरे संत सदगुरु जिजीमाय तशाच तापातच साखर खेर्डा येथे आल्या व नंतर दोन दिवसांनी जिजीमाईंचा ताप बरा झाला. सांगायचं तात्पर्य म्हणजे आपला भाव शुध्द असेल तर सद्गुरु कुठल्या न कुठल्या रुपात आपली अडचण दुर करतातच.फक्त आपली श्रद्धा बळकट असावी.अशा या जिजीमाईंचे महिमान वर्णन करणे अशक्य आहे.साक्षात् त्या आदि शक्तीनेच आपल्या सारख्या बद्ध जिवांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतला.
धन्य ती जिजीमाय! जैसे वासरालागी धेनुमाय ! 

५   ऑगस्ट २०२० 

भक्तिलक्षण—-मन आणि बुद्धीला ईश्वराचरणी समर्पित केलेला असा.

असा देह झोकीयला तो क्षणात ! नसे सौख्य त्याची नसे फार खंत !
धरीले मनी नित्य सर्वोत्तमाला !  नमस्कार माझा जिजीमाऊलीला !

जिजीमाय अत्यंत भोळ्या,निस्वार्थी स्वभावाच्या होत्या.श्री प्रल्हाद महाराजांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक काम करताना जिजीमाईंचा मुखाने नामजप सुरुच असे. महाराजांनी देखील अशाप्रकारे त्यांच्याकडून भव्य दिव्य साधना करुन घेऊन त्यांना आपल्या बरोबरीचे करुन टाकले. जिजीमाईंना पैसे देखील मोजता येत नसत त्यात त्यांना रसही नव्हता जर एखाद्याने जर पैसे मागितले तर हातात येतील तेवढे पैसे त्या देत असत.दारात एखादा भिकारी आला तर त्याला भाकरी देतांना देखील चतकोर,अर्धी न देता हातात येतील तेवढ्या भाकरी त्या देत असत.अहो एवढेच काय स्वयंपाक करताना देखील जिजी माईंनी कधीही मीठ,हळद,तिखट,मसाला मोजुन टाकले नाही हातात जेवढे येईल तेवढे टाकायच्या परंतु कधीही स्वयंपाक तिखट खारट वगैरे झाला नाही.उलट रुचकरच स्वयंपाक व्हायचा. पंक्तीमध्ये वाढताना देखील अगदी सढळ हाताने त्या वाढत असत आणि मायबाईंनी वाढले म्हणून कुणी अन्न टाकूनही देत नसत. अतिथीधर्म,गुरुसेवा,परोपकार या गोष्टी जिजीमाईंमध्ये उपजतच होत्या.काळे घरातील इतर सुनांसोबत वाद होऊ नयेत म्हणून श्री प्रल्हाद महाराज जिजीमाऊलीला नेहमी नामात रहावयास सांगत.एकदा चातुर्मास सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर महाराजांनी जिजीमाईंना सांगितले की "उद्यापासुन तुम्ही चार महिने मौनव्रत पाळून जप करावा" आणि पतीची आज्ञा शिरोधार्य मानुन जिजीमाईंनी चातुर्मासात मौनव्रत पाळून पूर्ण केला.या चातुर्मासानंतर या जपाच्या प्रभावाने जिजीमाईंच्या अंगी वाचासिद्धी आली.त्यांच्या मुखातुन जे निघेल ते खरे व्हायला लागले. तसेच या चातुर्मासानंतर जिजीमायस्वतः जवळ रामरायाच्या कुंकवाच्या पुड्या जवळ ठेवत असत. कुणाला दृष्ट लागली,कुणाला बाधा झाली,कुणी आजारी पडले असेल त्याला ही पुडी देत असत. व त्याला नामस्मरण करायला सांगत.आणि खरोखरच या पुडीने व नामजपाच्या प्रभावाने त्या व्यक्तीचे संकट दुर व्हायचे परंतु जिजीमाईंनी कधीही या गोष्टींचा बाजार मांडला नाही खरो खरच ज्याचा भाव शुद्ध आहे,व त्याला खरंच अडचण आहे अशांनाच त्या ही पूडी देत असत.त्याचप्रमाणे श्री रामानंद महाराज ब्रह्मचैतन्य महाराजांंच्या आज्ञेवरुन जालना राममंदिर येथे रामनवमीचा उत्सव करीत असत.या उत्सवामध्ये ज्यांना संंतती नाही असे बरेच दांपत्य रामानंद महाराजांकडे यायचे. रामानंद महाराज त्यांना जिजीमाईंच्या हाताने रामाचा प्रसाद म्हणून श्रीफळ देत असत.अशा अनेक जणांना या प्रसादाने संतती प्राप्त झाली. एवढा अधिकार जिजीमाईंचा होता जो रामानंद महाराज ओळखुन होते.

धन्य ते सद्गुरु ! धन्य ती मायबाई !

६ ऑगस्ट २०२० 

भक्ति लक्षण——-दृढ़निश्चय

रामनामाची शक्ती काय असते आणि सद्गुरुंचा वरदहस्त असेल आणि एखादि गोषट करायची ठरवली  तर कठीण गोष्टी देखिल सोप्या होऊन जातात याचे जिजीमाईंच्या बाबतीत पुढील उदाहरण आपल्या सर्वांसाठी नाम वाढवायला मार्गदर्शक ठरेल.

अकोला येथे गंग्रस नावाचे सद्गुरु भक्त होते. महाराज व मायबाईं यांच्याकडे नेहमी येत असत.गंग्रस यांचेकडे नित्य उपासना,नित्य जप चालत असेअसेच एका वेळी मायबाईं त्यांच्याकडे २-३ दिवसासाठी आल्या दररोज उपासना,जप यासाठी माय बाईं आल्यामुळे नेहमीपेक्षा जास्त भक्तांची गर्दी झाली होती. उपासना झाल्यानंतर काही भक्तांनी पिण्यासाठी पाणी मागितले परंतु घराच्या मागे विहिर असुनही तिला पाणी नव्हते म्हणून गंग्रस यांनी बाहेरून पाणी आणण्यासाठी एका सेवेक-यांना सांगितले. 

मायबाईंनी विहिरीला पाणी नसल्याचे अंतर्ज्ञानाने जाणले. मायबाईं सर्वांना म्हणाल्या " की उद्या आपल्याला गंग्रस यांची विहिर स्वच्छ करायची आहे तेव्हा सर्वांनी उद्या सकाळी या आणि मला एका मोठ्या टोपलीमध्ये बसवून विहीरीत सोडा मी देखील तुमच्यात सहभागी होणार आहे.दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेला सर्वजण आले. सुरुवातीला दोन भक्त खाली विहीरीत उतरले.मायबाईंनी सर्वांना रघुपती राघव हे भजन म्हणायला सांगितले व आपण स्वतः एका मोठ्या टोपलीत मऊ अंथरुण टाकून बसल्या.चार पाच जणांनी ही टोपली वरुन विहीरीत सोडायला सुरुवात केली. मायबाईंचे नामस्मरण सुरुच होते.विहिरीत उतर ल्यानंतर मायबाईंनी बघितले कि विहिरीत एक मोठा झरा आहे परंतु त्यातुन पाणी येत नव्हते तेव्हा माय बाईंनी त्याच्या तोंडाशी हात लावला व जोरात रामाचा व सद्गुरुंचा जयघोष केला तोच त्या झ-यातुन पाण्याचा मोठा फवारा उडाला व माय बाईंच्या चरणाचा स्पर्श करुन त्या पाण्याने विहीर भरायला सुरु केली. चार तासात संपूर्ण विहिर तुडूंब भरली असे हे रामनाम व सद्गुरुंचे महात्म्य आजही गंग्रस यांच्या या विहिरीचे पाणी आटत नाही.

७  ऑगस्ट २०२० 

भक्ति लक्षण—— यता्मा(मन इंदरीयानसहित वश केलेला)

अहिल्या,द्रौपदी,सीता, तारा, मंदोदरी" या पतिव्रता साध्वींच्या मालिकेत जिजीमाईंचे देखील नाव घ्यावे लागेल इतक्या पतिव्रता आपल्या जिजीमाय होत्या. जिजीमाईंचा गायनाचा आवाज खुप गोड,आर्ततेचा होता स्वामी माझा पाहिला....सोबतच 'गुरुमाय धाव घेई बुडतो प्रपंच डोही' हे पद देखील त्या भावपूर्ण म्हणत शिवाय त्यांना काव्यशक्ती देखील सद्गुरु कृपेने प्राप्त होती.साखरखेर्डा येथे एखाद्या उत्सवाला महिला किर्तनकार सेवेसाठी आल्या तर किर्तनाच्या पूर्वरंगाचा प्रारंभ जिजी माईंच्या पदानेच होत असे. भोजनप्रसादाच्या वेळी खणखणीत आवाजात त्या श्लोक म्हणत,लग्न, मौंज हळदीकुंकु सारख्या कार्यक्रमात जिजीमाय प्रत्येक स्त्रीची,सासरी गेलेल्या मुलींची आस्थेने विचारपूस करीत. गोंदवले हे तर जिजीमाईंचा जीव की प्राण.गोंदवले येथील मार्गशिर्ष महिन्यातील पुण्यतिथी उत्सवाला आधी प्रल्हाद महाराजां सोबत आणि नंतर भक्तांसोबत त्या येत असत. आयुष्यात कधीही हा उत्सव जिजी माईंनी चुकवला नाही. 

सन १९९१ च्या या उत्सवाला जिजीमाय गोंदवल्याला आल्या.सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराजांंच्या समाधीचे त्यांनी भावपूर्ण दर्शन घेतले,फुले वाहीली व प्रेमाश्रुने अभिषेक केला.इतर भक्तांनी मायबाईंना म्हटले कि गोंदवल्याला आल्यापासून तुम्ही विश्रांती घेतली नाही, काही खाल्ले देखिल नाही. फक्त दुधच प्राशन करत आहात.यावर मायबाईंनी उत्तर दिले गोंदवल्याचा हा उत्सव माझ्या आयुष्यातील शेवटचा उत्सव आहे,पुढील वर्षी मी काही हा उत्सव बघणार नाही म्हणून खाणे पिणे या शारीरिक गोष्टींपेक्क्षा मला माझ्या सद्गुरुंना डोळे भरुन पाहु द्या.यातच माझे पोट भरेल.त्यावेळी जिजीमाईंचे वय होते ८९ वर्ष. 

धन्य ते क्षेत्र ! धन्य ते ग्राम!

८  ऑगस्ट २०२० 

भक्ति लक्षण—दक्ष:

जिजीमाईंच्या आठवणी.एकदा श्री प्रल्हाद महाराजांंच्या मनात आले की जिजीमाईंची सद्गुरुनिष्ठा,नामनिष्ठा किती बळकट झाली आहे हे एका परीक्षेतुन बघावे.काही दिवसांनी महाराज मायबाईंसह देऊळगावराजाला प्रवासाला निघाले.देऊळगावराजाच्या अगोदरच ५-१० किमीवर गाडी थांबवुन महाराज जिजीमाईंना म्हणाले "आम्ही पूढे जातो, तुम्ही पायी चालत देऊळगावी या" पतीची आज्ञा शिरसावंद्य मानुन जिजीमाय देऊळगावला पायी जाण्यासाठी निघाल्या.  मुखाने अखंड नामजप सुरुच होता,काही अंतर चालल्यावर त्या काळातील पठाण लोक चोरीच्या उद्देशाने त्यांच्या मागे लागले.इकडं जिजीमाय नामाच्या धुंदीतच रस्ता पार करत होत्या.त्यांच्या नामाचे तेजोवलय पाहुन त्या पठाणी लोकांना पूढचा रस्ताच दिसेना. ते शेवटी परत फिरले,व जिजीमाय सुखरूप देऊळगावला पोहोचल्या. महाराजांनी स्मित हास्य करुन हा प्रसंग का निर्माण झाला हे सर्वांना सांगितले.रामानंद महाराजांना हा प्रसंग कळाल्यानंतर जिजीमाईंची पती आज्ञाधारकता व नामनिष्ठा पाहुन आपल्या स्वतःच्या पत्नीच्या पाटल्या,नथ हे प्रसाद म्हणून जिजीमाऊलीला दिल्या.या नथ,पाटल्या आजही साखरखेर्डा संस्थानमध्ये पहायला मिळतात.....

९ ऑगस्ट २०२० 

भक्ति लक्षण—शुचि:(शुद्ध आचार विचार असलेला)

जिजीमाईंची ही निस्पृह वृत्ती पाहुन असे वाटते की संत तुकारामांची पत्नीने आपले त्या जन्मातील रौद्ररुप टाकून या जन्मात जिजीमाईंच्या रुपाने सौम्य रुपात अवतार घेतला. गोंदवले येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज व रामानंद महाराज पुण्यतिथी उत्सवाला प.पू.प्रल्हाद महाराज हे साखरखेर्डा ते गोंदवले पायी पदयात्रेने येत असत.सोबत जिजीमाय सहीत बरेच भक्तगण असत.त्या निमित्ताने वाटेल येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये रामनामाचा प्रचार करत असत.गोंदवले उत्सव सुरु होण्याच्या दोन दिवस अगोदर पोहोचत.वाटेमध्ये सर्व भक्तांचि भोजन व्यवस्था जिजीमायच पहात असत. गोंदवले येथे आल्यानंतरही प्रल्हाद महाराजांनी जिजीमाईंना सोवळ्याच्या स्वयंपाकाची, रामाच्या महाराजांंच्या नैवैद्याची सेवा दिलेली होती जी मायबाईंनी अगदी निस्वार्थपणे केली. प.पू.प्रल्हाद महाराज व जिजीमाय गोंदवले येथे अगदी सर्वसामान्य सेवेक-यासारखे वागायचे,कुणालाही त्या ठिकाणी स्वतःला नमस्कार करु द्यायचे नाही , कारण विचारल्यावर सांगायचे " गोंदवले म्हणजे आपल्यासाठी माहेर आहे.आणि या ठिकाणी फक्त मोठे महाराज ( सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज) कायमस्वरुपी विराजमान आहेत,आणि वडीलांसमोर मुलांना नमस्कार करणे योग्य आहे का?इथे सत्ता चालते ती फक्त महाराजांची आपण सर्व सेवेकरी आहोत" केवढा हा मनाचा मोठेपणा! केवढी ही सद्गुरुंच्या बद्दल भावना, आणि विशेष म्हणजे गोंदवले येथे ब्रह्मचैतन्य महाराजांंच्या पादुका पालखीत ठेवणे, गुलालाची किर्तनसेवा इ.सेवा जालना राममंदिर कडे पहिल्या पासुनच दिलेली आहे आधी रामानंद महाराज,त्यांच्यानंतर प्रल्हाद महाराज आणि आता स.भ.श्री रामदासपंत आचार्य ही सेवा करताहेत. परंतु कुठेही याचा गर्व महाराजांना झाला नाही. श्री प्रल्हाद महाराजांनंतर जिजीमाईंनी ही गोंदवले पायी यात्रा सुरुच ठेवली.प्रत्येक उत्सवाला जिजीमाय येत असत.दशमीला ब्रह्मचैतन्य महाराजांचा गुलाल व द्वादशीला रामानंद महाराजांचा गुलाल करुन परत साखरखेर्डा येथे येत असत.जिजीमाईंचे "स्वामी माझा पाहिला या माणगंगातिरी" हे पद अतिशय आवडीचे होते.आणि त्या स्वतः हे पद अत्यंत सुंदर आवाजात चालीत नेहमीच म्हणत असत.वास्तविक पहाता मायबाईंना लिहीणे वाचणेही जमत नसे परंतु त्यांची स्मरणशक्ती इतकी प्रचंड होती की कुठलेही पद एकदा ऐकलं की त्यांना ते पाठ होत असे. महाराजांनी देह ठेवल्यानंतर मायबाई सोवळ्याची व्यवस्था पहात नव्हत्या तर दुसरी जी पाकशाळा गोंदवल्याला आहे तेथे लक्ष देत होत्या तेही अगदी सर्वसामान्य सेवेक-यासारखं ! धन्य ती माऊली ! धन्य ते गोंदवले !

१० ऑगस्ट २०२० 

भक्ति
श्रीराम समर्थ
भक्ति योगात भक्ताचे जीतके लक्षण संगितले आहेत मला वाटंत ते सगलेच लक्षणे जीजीमायीं मधेहोते 

गुरुमाय प्रल्हाद माझी कृपाळू ! 
तया लाभली ज्ञानपत्नी दयाळू !
जिजीमाय संबोधिती भक्त तीला !
नमस्कार माझा जिजीमाऊलीला !

जिजीमाय म्हणजे महाराजांंच्या बरोबरीच्या अधिकारी स्ञीसंतच होय. जिजीमाय म्हणजे सर्वगुणसंपन्न भांडारच. नामजप, सद्गुरुसेवा, पतीव्रता पण अखंड रामनाम, साधना इत्यादी गुणांमुळे जिजीमाईंच्या हातुन भक्त, सर्वसामान्य माणसे ,नामाला लागावित यासाठी बरेच चमत्कारिक लीला घडल्या.परंतु या ठिकाणी सर्व लिहीणे किंवा सांगणे शक्य नाही. म्हणून आतापर्यंत जेवढे चरित्र आपण पाहिले त्यातील आजचा हा कळसाध्याय आहे. सततचा प्रवास, दगदग,संस्थानसाठी,रामनाम प्रचारासाठी सतत भिक्षाफेरी , इत्यादी कारणांमुळे मायबाईंचे शरीर आता थकले होते.शेवटी संतांना देखील भोग चुकले नाहीत.त्यामुळं सर्व गावातील भक्तमंडळी जिजीमाईंना भेटायला साखरखेर्डा येथे येऊ लागली होती.इ.स.१९९३ सालातील वैशाख वद्य अष्टमी पर्यंत मायबाईंची प्रकृती ठिक होती पण यानंतर त्यांना चक्कर येणे,शुद्ध हरपणे याचा त्रास वाढला होता परंतु त्याही परीस्थितीत त्यांचे अखंड नामस्मरण सुरुच होते.आणि आलेल्या भक्तांना देखिल मायबाईं सांगत की रामाला व महाराजांंना विसरु नका,सतत नामात रहा,राम तुमचे कल्याण करील.जमलेले भक्त जिजीमाईंची सेवा करीत होते कुणी तीर्थ पाजत,कुणी पाय चेपीत. मायबाईंचा उजवा पाय पूर्णतः निकामी झाला होता फक्त डाव्या पायाची हालचाल होत होती. जमलेल्या भक्तांमध्ये प्रामुख्याने श्री रामदासपंत आचार्य,प्रकाशराव बामनीकर, कैलास गिंदोडीया, गदाधरशास्त्री इ.होते.यांनी मायबाईंचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. यावेळी मायबाईंचे वय ८९ वर्ष होते.शरीरही उपचारांना साथ देत नव्हते.आणि अचानक वैशाख वद्य दशमी सन १९९३ रोजी जिजीमाईंना अर्धांग वायुचा जोरदार झटका आला.व त्यातच त्यांची प्राणज्योत सद्गुरु रामानंद महाराजांंच्या पदाशी विलीन झाली.यानंतर सद्गुरु प्रल्हाद महाराजांंच्या समाधीच्या डाव्या बाजुला मायबाईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नंतर त्या जागेवर वृंदावन बांधण्यात आले.पुतण्या जनार्दन काळे यांनी सर्व विधी केले.श्रीक्षेत्र पैठण येथील कृष्णकमल तिर्थावर दशक्रीया विधी करण्यात आला. रामनामाचे एक धगधगते कुंड आज पूर्णतः विसाव्याला गेले.त्या आदिमाया, आदिशक्तीने आपला जिजीमाईंचा अवतार संपवून रामरायामध्ये विलीन केला. जिजीमाईंच्या या सर्व चरीत्रा वरुन सर्व समाजाने थोडासा जरी आदर्श घेतला तर सर्व समस्यांना सामोरे जाण्याचे बळ येईल. आपल्या सर्वांना रामनामाची, रामरायाची, सद्गुरुंची, ओढ लागावी व हा भवसागर पार करुन जाण्यासाठी जिजीमाईंचे हे चरीत्र नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

🙏🏻जय जय रघुवीर समर्थ ....🙏🏻🌿🌹🌺🌸🌼
आज पासुन या चरित्रास विराम देत आहे.

श्रीराम समर्थ

आता पर्यन्त आपण पाहिलया प्रमाणे श्री प्रह्लाद महाराज व जिज़िमायी यांचा जन्म २० व्या शतकात झाला.लग्नाचया वेलीं महाराजँचे वय १३ व जिजिमायींचे वय ९ वर्षें होते. त्या दोघांचा आध्यात्मिक संसार ,त्यनि एकमेकना दिलेलि साथ,त्यनि दिलेलि रामनामाची शिकवण हे सगंल आपण पाहिलं.कुठलेहि संत हे आपलयाला जून्या कालातीत वाटतात पण श्री प्रह्लाद महाराज व जिज़िमायी हे अगदी अलीकडचे आहेत.

आमच्या गावाँपासूँन साखरखेडा अगदी जवल आहे. आईचे गुरु प्रह्लाद महाराज.त्यामूले लहान असताना बरेचदा आई सोबत महाराजांकडे जाणे झाले.आई सांगते की महाराज आमचे कडील २/३ लग्नात आले होतें.पण मी त्याना पाहिलेले आठवत नाही. पण जिज़िमायी पूर्ण आठवतात.

मी lefty आहे. लहानपणापासुन सगलं काम डाव्या हाताने करायची सवय आहे.लहानपाणि जप पण डाव्या हाताने करायची.एकदा अशीच आईसोबत गेली असतांना महाराजांसमोर बसून जप करत बसली होती. खुप वेलानंतर जिज़िमायी नी मला जवल बोलावलं आणि सांगितले की तु किती वेल झाला जप करते आहे पण आता उजव्या हाताने कर.मी मान डोलावली आणि परत बसली. सवयीप्रमाणे काही वेलानंतर आपोआप माल डाव्या हातात गेली.त्या वर त्या बोलालया की जप महत्वाचा आहे.कसाहि कर.ही माझी त्यांचि शेवटची आठवण.

Thanx to maharaj 🙏🙏
         

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099