अध्याय ९: ओव्या १९७-२६४

५ मे २०१९ निरुपण 
अध्याय ९ : राजविद्याराजगुह्ययोगः (गीता श्लोक १४-१५/ ज्ञानेश्वरी ओव्या १९७-२६४)
सततं किर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः । नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥ १४॥
तरी कीर्तनाचेनि नटनाचे । नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे । जें नामचि नाहीं पापाचें । ऐसें केलें ॥ १९७ ॥
यमदमा अवकळा आणिली । तीर्थें ठायावरूनि उठविलीं ।यमलोकींची खुंटिली । राहाटी आघवी ॥ १९८ ॥
यमु म्हणे काय यमावें । दमु म्हणे कवणातें दमावें । तीर्थें म्हणतीं काय खावें । दोष ओखदासि नाहीं ॥ १९९ ॥
ऐसें माझेनि नामघोषें । नाहींचि करिती विश्वाचीं दुःखें । अवघें जगचि महासुखें । दुमदुमित भरलें ॥ २०० ॥
ते पाहांटेवीण पाहावित । अमृतेंवीण जीववित । योगेंवीण दावित । कैवल्य डोळां ॥ २०१ ॥
परी राया रंका पाड धरूं । नेणती सानेयां थोरां कडसणी करूं । एकसरें आनंदाचें आवारु । होत जगा ॥ २०२ ॥
कहीं एकाधेनि वैकुंठा जावें । तें तिहीं वैकुंठचि केलें आघवें । ऐसें नामघोषगौरवें । धवळलें विश्व ॥ २०३ ॥
तेजें सूर्य तैसें सोज्वळ । परि तोहि अस्तवे हें किडाळ । चंद्र संपूर्ण एखादे वेळ । हे सदा पुरते ॥ २०४ ॥
मेघ उदार परी वोसरे । म्हणौनि उपमेसी न पुरे । हे निःशंकपणें सपांखरे । पंचानन ॥ २०५ ॥
जयांचे वाचेपुढां भोजें । नाम नाचत असे माझें । जें जन्मसहस्रीं वोळगिजे । एकवेळ यावया ॥ २०६ ॥
तो मी वैकुंठीं नसें । वेळु एक भानुबिंबींही न दिसें । वरी योगियांचींही मानसें । उमरडोनि जाय ॥ २०७ ॥
परी तयांपाशीं पांडवा । मी हारपला गिंवसावा ।जेथ नामघोषु बरवा । करिती माझा ॥ २०८ ॥
कैसे माझ्या गुणीं धाले । देशकालातें विसरले । कीर्तनें सुखी झाले । आपणपांचि ॥ २०९ ॥
कृष्ण विष्णु हरि गोविंद । या नामाचे निखळ प्रबंध ।माजी आत्मचर्चा विशद । उदंड गाती ॥ २१० ॥
हे बहु असो यापरी । कीर्तित मातें अवधारीं । एक विचरती चराचरीं । पंडुकुमरा ॥ २११ ॥
मग आणिक ते अर्जुना । साविया बहुवा जतना । पंचप्राण मना । पाढाऊ घेउनी ॥ २१२ ॥
बाहेरी यमनियमांची कांटी लाविली । आंतु वज्रासनाची पौळी पन्नासिली । वरी प्राणायामाचीं मांडिलीं । वाहातीं यंत्रें ॥ २१३ ॥
तेथ उल्हाट शक्तीचेनि उजिवडें । मन पवनाचेनि सुरवाडें । सतरावियेचें पाणियाडें । बळियाविलें ॥ २१४ ॥
तेव्हां प्रत्याहारें ख्याती केली । विकारांची सपिली बोहलीं । इंद्रियें बांधोनि आणिली । हृदयाआंतु ॥ २१५ ॥
तंव धारणावारु दाटिन्नले । महाभूतांतें एकवटिलें । मग चतुरंग सैन्य निवटिलें । संकल्पाचें ॥ २१६ ॥
तयावरी जैत रे जैत । म्हणौनि ध्यानाचें निशाण वाजत । दिसे तन्मयाचें झळकत । एकछत्र ॥ २१७ ॥
पाठीं समाधीश्रियेचा अशेखा । आत्मानुभव राज्यसुखा । पट्टाभिषेकु देखा । समरसें जाहला ॥ २१८ ॥
ऐसें हें गहन । अर्जुना माझें भजन । आतां ऐकें सांगेन । जे करिती एक ॥ २१९ ॥
तरी दोन्ही पालववेरी । जैसा एक तंतू अंबरीं ।तैसा मीवांचूनि चराचरीं । जाणती ना ॥ २२० ॥
आदि ब्रह्मा करूनी । शेवटीं मशक धरूनी । माजी समस्त हें जाणोनि । स्वरूप माझें ॥ २२१ ॥
मग वाड धाकुटें न म्हणती । सजीव निर्जीव नेणती । देखिलिये वस्तु उजू लुंटिती । मीचि म्हणौनि ॥ २२२ ॥
आपुलें उत्तमत्व नाठवे । पुढील योग्यायोग्य नेणवे । एकसरें व्यक्तिमात्राचेनि नांवें । नमूंचि आवडे ॥ २२३ ॥
जैसें उंचीं उदक पडिलें । ते तळवटवरी ये उगेलें । तैसें नमिजे भूतजात देखिलें । ऐसा स्वभावोचि तयांचा ॥ २२४ ॥
कां फळलिया तरूची शाखा । सहजें भूमीसी उतरे देखा । तैसें जीवमात्रां अशेखां । खालावती ते ॥ २२५ ॥
अखंड अगर्वता होऊनि असती । तयांची विनय हेचि संपत्ती । जे जयजय मंत्रें अर्पिती । माझ्याचि ठायीं ॥ २२६ ॥
नमितां मानापमान गळाले । म्हणौनि अवचितां मीचि जहाले । ऐसे निरंतर मिसळले । उपासिती ॥ २२७ ॥
अर्जुना हे गुरुवी भक्ती । सांगितली तुजप्रती । आतां ज्ञानयज्ञें यजिती । ते भक्त आइकें ॥ २२८ ॥
परि भजन करिती हातवटी । तूं जाणत आहासि किरीटी । जे मागां इया गोष्टी । केलिया आम्हीं ॥ २२९ ॥
तंव आथि जी अर्जुन म्हणे । हें दैविकिया प्रसादाचें करणें ।तरि काय अमृताचें आरोगणें । पुरे म्हणवे ? ॥ २३० ॥
या बोला श्रीअनंतें । लागटा देखिलें तयांतें । कीं सुखावलेनि चित्तें । डोलतु असे ॥ २३१ ॥
म्हणे भलें केलें पार्था । एर्‍हवीं हा अनवसरु सर्वथा । परि बोलवितसे आस्था । तुझी मातें ॥ २३२ ॥
तंव अर्जुन म्हणे हे कायी । चकोरेंवीण चांदणेंचि नाहीं । जगचि निवविजे हा तयाच्या ठायीं । स्वभावो कीं जी ॥ २३३ ॥
येरें चकोरें तिये आपुलिये चाडे । चांचू करिती चंद्राकडे । तेवीं आम्ही विनवूं तें थोकडें । देवो कृपासिंधु ॥ २३४ ॥
जी मेघु आपुलिये प्रौढी । जगाची आर्ती दवडी । वांचूनि चातकाची ताहान केवढी । तो वर्षावो पाहुनी ? ॥ २३५ ॥
परि चुळा एकाचिया चाडे । जेवीं गंगेतेंचि ठाकणें पडे । तेवीं आर्त बहु कां थोडे । तरी सांगावें देवें ॥ २३६ ॥
तेथें देवें म्हणितलें राहें । जो संतोषु आम्हां जाहला आहे । तयावरी स्तुति साहे । ऐसें उरलें नाहीं ॥ २३७ ॥
पैं परिसतु आहासि निकियापरी । तेंचि वक्तृत्वा वर्‍हाडीक करी । ऐसें पुरस्करोनि श्रीहरी । आदरिलें बोलों ॥ २३८ ॥
ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते । एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम् ॥ १५॥
तरी ज्ञानयज्ञु तो एवं रूपु । तेथ आदिसंकल्पु हा यूपु । महाभूतें मंडपु । भेदु तो पशु ॥ २३९ ॥
मग पांचांचे जे विशेष गुण । अथवा इंद्रियें आणि प्राण । हेचि यज्ञोपचारभरण । अज्ञान घृत ॥ २४० ॥
तेथ मनबुद्धीचिया कुंडा । आंतु ज्ञानाग्नि धडफुडा । साम्य तेचि सुहाडा । वेदिका जाणें ॥ २४१ ॥
सविवेकमतिपाटव । तेचि मंत्र विद्यागौरव । शांति स्रुक्-स्रुव । जीवु यज्वा ॥ २४२ ॥
तो प्रतीतीचेनि पात्रें । विवेकमहामंत्रें । ज्ञानाग्निहोत्रें । भेदु नाशी ॥ २४३ ॥
तेथ अज्ञान सरोनि जाये । आणि यजिता यजन हें ठाये । आत्मसमरसीं न्हाये । अवभृथीं जेव्हां ॥ २४४ ॥
तेव्हां भूतें विषय करणें । हें वेगळालें कांहीं न म्हणे ।आघवें एकचि ऐसें जाणें । आत्मबुद्धि ॥ २४५ ॥
जैसा चेइला तो अर्जुना । म्हणे स्वप्नींची हे विचित्र सेना । मीचि जाहालों होतों ना । निद्रावशें ? ॥ २४६ ॥
आतां सेना ते सेना नव्हे । हें मीच एक आघवें । ऐसें एकत्वें मानवें । विश्व तयां ॥ २४७ ॥
मग तो जीवु हे भाष सरे । आब्रह्म परमात्मबोधें भरे । ऐसे भजती ज्ञानाध्वरें । एकत्वें येणें ॥ २४८ ॥
अथवा अनादि हें अनेक । जें आनासारिखें एका एक । आणि नामरूपादिक । तेंही विषम ॥ २४९ ॥
म्हणौनि विश्व भिन्न । परि न भेदे तयाचें ज्ञान ।जैसे अवयव तरि आन आन । परि एकेचि देहींचे ॥ २५० ॥
कां शाखा सानिया थोरा । परि आहाति एकाचिया तरुवरा । बहु रश्मि परि दिनकरा । एकाचे जेवीं ॥ २५१ ॥
तेवीं नानाविधा व्यक्ती । आनानें नामें आनानी वृत्ती । ऐसें जाणती भेदलां भूतीं । अभेदा मातें ॥ २५२ ॥
येणें वेगळालेपणें पांडवा । करिती ज्ञानयज्ञु बरवा । जे न भेदती जाणिवा । जाणते म्हणौनि ॥ २५३ ॥
ना तरी जेधवां जिये ठायीं । देखती कां जें जें कांहीं । तें मीवांचूनि नाहीं । ऐसाचि बोधु ॥ २५४ ॥
पाहें पां बुडबुडा जेउता जाये । तेउतें जळचि एक तया आहे । मग विरे अथवा राहे । तर्‍ही जळाचिमाजीं ॥ २५५ ॥
कां पवनें परमाणु उचलले । ते पृथ्वीपणावेगळे नाहीं केले ।आणि माघौते जरी पडले । तरी पृथ्वीचिवरी ॥ २५६ ॥
तैसें भलतेथ भलतेणें भावें । भलतेंही हो अथवा नोहावें । परि तें मी ऐसें आघवें । होऊनि ठेले ॥ २५७ ॥
अगा हे जेव्हडी माझी व्याप्ती । तेव्हडीचि तयांची प्रतीती । ऐसें बहुधाकारीं वर्तती । बहुचि हौनि ॥ २५८ ॥
हें भानुबिंब आवडे तया । सन्मुख जैसें धनंजया । तैसे ते विश्वा यया । समोर सदा ॥ २५९ ॥
अगा तयांचिया ज्ञाना । पाठी पोट नाहीं अर्जुना । वायु जैसा गगना । सर्वांगीं असे ॥ २६० ॥
तैसा मी जेतुला आघवा । तेंचि तुक तयांचिया सद्‍भावा । तरी न करितां पांडवा । भजन जहालें ॥ २६१ ॥
एर्‍हवीं तरी सकळ मीचि आहें । तरी कवणीं कें उपासिला नोहें ? । एथ एकें जाणणेवीण ठाये । अप्राप्तासी ॥ २६२ ॥
परि तें असो येणें उचितें । ज्ञानयज्ञें यजितसांते । उपासिती मातें । ते सांगितलें ॥ २६३ ॥
अखंड सकळ हें सकळां मुखीं । सहज अर्पत असे मज एकीं । कीं नेणणें यासाठीं मूर्खीं । न पविजेचि मातें ॥ २६४ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099